नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश पावसाच्या तडाख्याने झालेल्या नुकसानीची भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार आहे. दोन्ही मिळून एकूण 266.63 कोटी रुपयांच्या कामांचा तपशील आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका संयुक्त पत्रपरिषदेत जाहीर केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न भूतो…असा अवघ्या 4 तासात 112 मि.मी. पाऊस झाला. अतिवृष्टी आणि पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठीची एनडी आरएफ मानकानुसार तातडीची मदत देण्यात आली. नागनदी, पिवळी नदीच्या भिंती फुटल्या. पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, म्हणून काही निर्णय घेण्यात आले आहेत.
दीडशे वर्ष जुने धरण असलेल्या अंबाझरी धरणाचे बळकटीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यात जीर्ण भींतींचे काँक्रिटीकरण आणि सुरक्षिततेसाठी 21.07 कोटी, तर माती धरण दुरुस्ती, दगडी पिचिंग, खाली एक ड्रेन इत्यादी कामांसाठी 11.35 कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, महापालिकेने राज्य सरकारकडे 234.21 कोटी रुपयांचा एक प्रकल्प अहवाल सादर केला अंबाझरी ते पंचशील चौकापर्यंत सुमारे 5 कि.मी.चे अंतर असलेल्या नदीचे 1 मीटरपर्यंत खोलीकरण करण्यात येऊन त्यातून गाळ काढण्यात येईल, यामुळे पाण्याची क्षमता वाढेल. मोठ्या प्रमाणात पाणी अडलेल्या नासुप्रच्या स्केटिंग रिंग पार्किंग मोकळे करुन तेथील प्रवाह सुरळीत होण्यासाठी पार्किंग पिल्लर काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिंगणा एमआयडीसी हा अंबाझरीचा ग्राहक होऊ शकतो. यासंदर्भात शक्यता पडताळून पाहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शहरातील ड्रेनेजचा इंडिग्रेटेड प्रकल्प
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पंचशील चौकापर्यंतची सर्व पुलांची कामे यात करण्यात येतील. अंबाझरीच्या पाण्याचे शुद्धीकरण करुन काही भागात देण्याचा सुद्धा विचार सुरु आहे. जायकाच्या मदतीने 2400 कोटींचा नागनदीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. यात शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यात उर्वरित तीन मतदारसंघ समाविष्ट करण्यात येतील हा खर्च नासुप्र आणि मनपा करेल अशा प्रकारे शहरातील ड्रेनेजचा इंडिग्रेटेड प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. नागनदीच्या भोवती झालेले अतिक्रमण कुणाचेही असू द्या, काढण्यात येईल असेही एका प्रश्नाच्या उत्तरात गडकरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सिमेंट रोडमुळे हा प्रॉब्लेम वाढल्याचा इन्कार करताना अंबाझरी,फुटाळा कुणाचे याचाच पत्ता नव्हता,आता अंबाझरी तलावाची जबाबदारी मनपाने घेतल्याचे सांगितले. अंबाझरी तलावात 30 टक्केच पाणी साठवण होत असल्याने खोलीकरणसह ती क्षमता वाढविण्याचा, वाडी आणि एमआयडीसी,खेड्यांची घाण यात येऊ नये यावर भर दिला.