हिंगोली2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगरहून मोर्चा करून गावाकडे परत जात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या टेम्पोचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 40 जण जखमी झाले असून 20 ते 25 गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या जखमींमध्ये सुमारे 25 ते 30 महिलांचा समावेश आहे. ही घटना हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा शिवारात घडली.
सर्व जखमी सुकळी गावातील
जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे. जखमी झालेले सर्वजण वसतम तालुक्यातील सुकळी या गावचे आहेत. MH 26 AD 5212 असा अपघातग्रस्त टेम्पोचा क्रमांक आहे.
वाहनाने कट मारताच चालकाचे नियंत्रण सुटले
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी आज मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला होता. त्यानंतर घरी परतत असताना टेम्पोला अपघात झाला. समोरून एका अवजड वाहनाचे कट मारल्यानंतर या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.
20 जणांना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल
या अपघातात जखमी झाल्यानंतर 20 जणांना तातडीने जिंतूर रामा केअर सेंटर मध्ये दाखल करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. तर उरलेल्या 20 जणांना परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातामध्ये यावेळी औंढा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 108 रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी अरुण लाहोटी आणि चालक महेश कांगणे यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी वंचितच्या सपना घनसावध सतीश वाकळे यांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.
दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी मोर्चा
राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्यासाठी मोठा निधी जाहीर केला होता. मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत वंचितच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चा झाल्यानंतर परत जात असताना MH 26 AD 5212 या टेम्पोचा लिंबाळा शिवार या ठिकाणी अपघात झाला. या टेम्पोमध्ये असलेले 40 जण यामध्ये जखमी झाले.