मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : मुलंडमधील गुजराती व्यक्तींनी महाराष्ट्रीयन माणसांना घर नाकारल्याच्या घटनेचा सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील एक्स पोस्टद्वारे मराठी माणसासोबतची मुजोरी सहन केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईती मुलुंड येथे एका गुजराती व्यक्तीने महाराष्ट्रीयन लोकांना घर देण्यास नकार दिल्याची तक्रार एका महिलेने दिली. या तक्रारीनंतर सोशल मीडियावर या घटनेशी संबंधीत व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रीयन लोकांना मुंबईत घर नाकारल्याचा संताप मुंबईकरांसह महाराष्ट्रातून व्यक्त केला जात आहे. या घटनेवर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी एक्स पोस्ट करुन सरकारला जाब विचारला आहे.
अशोक चव्हाण यांनी एक्स पोस्ट मध्ये लिहिले आहे की, मुलुंडमधील ही घटना अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठी माणसासोबतच मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी असे या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
भांडुप (ता २७) मुलुंडमध्ये महाराष्ट्रीयन माणसाला इमारती मध्ये घर देणार नाही असे सांगून गुजराती माणसांनी घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा, आणि जाब विचारल्यावर मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला. मुलुंड पश्चिमला शिवसदन इमारतीमध्ये भाड्याने जागा पाहण्यास गेले असता घर मालकाने महाराष्ट्रीयन माणसाला घर देणार नाही असे सांगत धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती यांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ देखील तृप्ती यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. याची माहिती मिळताच मुलुंड मधील मनसैनिकांनी तृप्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांना घेऊन सदर गुजराती व्यक्तींना जाब विचारला आणि तृप्ती यांची माफी मागायला लावली. मात्र या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठी माणसालाच Maharashtrians are not allowed म्हणून मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी. https://t.co/PUYnUClc6J
— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 27, 2023