पुणे8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेस व भाजपाने मराठा समाजाचा सत्यानाश केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणा. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊ, अशी भूमिका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शनिवारी पुण्यात मांडली आहे.
पुण्यात एका कार्यक्रम निमित्ताने आले असता जानकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जानकर म्हणाले, मराठे, धनगर, मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, काँग्रेस व भाजपा मराठा समाजास कदापि आरक्षण देणार नाही. संबधित पक्ष हे केवळ मराठा समाजाला झुलवत ठेवणार आहे. या देशात पहिले आरक्षण हे छत्रपती शाहू महाराजांनी विविध समाजघटकांना दिले. मात्र, 100 वर्षांनंतर शाहू महाराजांच्या मराठा समाजालाच आरक्षण मागावे लागत आहे, ही समाजाची शोकांतिका आहे.
शेतकरी कामगार पक्ष राहिला असता, तर मराठा समाजाला न्याय देऊ शकला असता. मात्र, काँग्रेस व भाजपाने मराठा समाजाची अवस्था दयनीय केली आहे. आज केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर आरक्षण देणे अवघड नाही. आज मराठय़ांसारखीच अवस्था धनगर व मुस्लिमांची अवस्था आहे. म्हणूनच माझी मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला विनंती आहे, की तुम्ही या मंडळींच्या मागे जाऊ नका. रासपला पाठबळ द्या. राज्यात रासपचे सरकार आणा. आमचे सरकार सत्तेवर आल्यास दुसऱया दिवसापासून या सर्व समाजघटकांना आरक्षण देऊ, अशी ग्वाही जानकर यांनी यावेळी दिली.