वाशीम; महातंत्र वृत्तसेवा : राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. कारागृहात कैद्यांना फोनसह सोई-सुविधा मिळतात. कैद्यांना कारागृहात जावयासारखी वागणूक मिळते. गृह खात्याचा कारभार असलेले देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अशा जिल्ह्यात चिमुकल्या मुलीचा निर्घृणपणे खून होतो. ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून गृह खात्याचा धाक उरलेला नाही. गृहखाते सांभाळण्यात देवेंद्र फडणवीस पुर्णपणे असमर्थ ठरल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेच्या टप्पा-२ च्या निमित्ताने वाशीम येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून तत्पूर्वी हॉटेल मनीप्रभा येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अंधारे पुढे म्हणाल्या की, राज्यातील युवक ड्रग्सच्या आहारी गेल्याने त्यांचे भविष्य अंधकारमय असून ड्रग्सची चौकशी थंडबस्त्यात आहे. संजीव कुमार हे दोषी असूनही त्यांना अटक होत नाही, त्यांच्यावर विशेष मेहरबानी कुणाची? राज्यातील महिलाच नव्हे चिमुरड्या बालिकाही सुरक्षित राहील्या नाहीत. नेत्यांची घरे जाळली जातात, त्यावर गृहमंत्री बोलत नाहीत. निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यासाठीच पोलीस खात्यांचा वापर केला जात आहे.
यावेळी अंधारे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल करुन त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नसून केवळ टक्केवारीचे राजकारण महत्वाचे वाटत असल्याचा आरोप केला.
यावेळी शिवसेनेचे माजी आमदार संजय देशमुख, जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, समन्वयक सुरेश मापारी, नीतीन मडके, अशीष इंगोले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरक्षणावरुन जाती-जातीत भांडणे
आरक्षणाचा प्रश्न मुलभुत हक्काशी निगडीत असल्यामुळे त्यावर संसदेतूनच तोडगा निघू शकतो. मात्र जाती-जातीत तेढ निर्माण न करता जर भाजपला आरक्षण द्यायचे असेल तर संसदेत बहुमत असल्यामुळे भाजपने ते दिले पाहीजे. भाजपाकडे कोणतेच मुद्दे उरले नसल्यामुळे हे मुददे बाजूला सारुन आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा :