नंदुरबारसाठी ‘तापी’तून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना; तातडीने आराखडा बनवा : मंत्री गावित | महातंत्र

नंदुरबार; महातंत्र वृत्तसेवा : शहर परिसरासह खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या, कमी पर्जन्यमानामुळे आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी पातळीत सातत्याने घट होत आहे.

यामुळे नंदुरबार शहरासाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गावित दिले आहेत. तसेच वर्षभरात या योजनेला मंजूरी घेऊन नंदुरबारवासीयांना बारमाही, २४ तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. या संदर्भात नंदुरबार शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, यंदा पर्जन्यमान कमी असून नंदुरबार शहराला व आसपासच्या ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्याऱ्या स्रोतांमध्ये व प्रामुख्याने विरचक धरणात जलसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षात शहराला एक किंवा दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर शहरानजीकच्या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणावर होणारे नागरीकरण त्यामुळे एकट्या विरचक धरणावर येणाऱ्या काळात अवलंबून राहता येणार नाही.

ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जीवन प्राधिकारणाचे अधिकारी यांना तापी नदीवरून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा आराखडा तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या वर्षाच्या आत या योजनेला शासनाची मंजूरी घेवून, नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न शाश्वत स्वरूपात सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या जिल्ह्यातून तापी नदी वाहते, गेल्या कित्येक वर्षांपासून या नदीने आपल्याला सुजलाम-सुफलाम केले आहे. जिल्ह्यातील शहादा, तळोदा यासारख्या शहरांनाही तापी नदीवरून पाणी पुरवठा केला जातो. नंदुरबार हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने त्यासाठीही तापी नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे, त्याचा उपयोग भविष्यकाळासाठी करून घेण्यात येईल. तसेच येणाऱ्या काळात तापी नदीवरून ग्रामीण भागासाठी काही विभागीय पाणी पुरवठा योजना प्रस्तावित असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

टंचाई लक्षात घेवून पेयजल व ‘रोहयो’ चे नियोजन करावे

जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता जिल्हाधिकारी, जिल्ह परिषद, पाणी पुरवठा विभाग, कृषि, पशुसंवर्धन, पाटबंधारे विभाग यांना पेयजलाची परिस्थिती, गरजेचा अंदाज घेवून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात दिल्या आहेत. तसेच टंचाईचा अंदाज घेऊन रोजगार हमीची कामे सुरू करण्याचेही नियोजन करण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *