अमरावती6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाच्या माध्यमातून मातृभूमीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी म्हणून सरकारी अधिकारी-कर्मचारी घरोघरी जाऊन राष्ट्रभक्ती जागृत करणार आहेत. या अभियानादरम्यान मातृभूमीसाठी झटणाऱ्या शूरवीरांचा सन्मानही केला जावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शनिवारी येथे दिले.
अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून घरोघरी देशभक्तीचा जागर व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणेसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त देवीदास पवार तसेच दूरदृष्य प्रणालीव्दारे उपविभागीय अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
माती किंवा तांदुळ गोळा करावी- पंडा
पंडा म्हणाले की, प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदुळ 30 सप्टेंबरपर्यंत कलशांमध्ये गोळा करावे. सोबतच पंचप्रण शपथही द्यावी. माती संकलन करताना उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल, यासाठी ढोलताशे, देशभक्तीपर गीत व इतर उपक्रमांच्या माध्यमातून वाजतगाजत माती संकलित करावी. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या अधिनस्त सर्व शाळांना सहभागी करुन घ्यावे. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रॅली, कलापथक, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविधांगी उपक्रमातून अमृत कलश यात्रेची स्थानिक स्तरावर जनजागृती करावी.
1 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम
या अभियानात लोकप्रतिनिधी, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रभारी जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी केले. अमृत कलश यात्रेविषयी सांगताना ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती किंवा तांदूळ कलशांमध्ये गोळा करण्यात येईल. त्यानंतर 1 ते 13 ऑक्टोबरपर्यंत तालुका स्तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या स्तरावर गोळा केलेली सर्व माती आणि तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशामध्ये एकत्र करण्यात येतील. यावेळी जिल्हा किंवा शहरातल्या सांस्कृतिक संस्था, एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून कार्यक्रम केले जातील. संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले जवान, पोलिस, स्वातंत्र्य सैनिक किंवा हुतात्म्यांचे कुटुंबीय यांचा यावेळी गौरव करण्यात येईल.
दिल्लीच्या अमृत वाटिकेत विसर्जन
२२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे कलश मुंबईत एकत्र आणण्यात येतील. तर २७ ऑक्टोबरला मुंबईतून ते विशेष रेल्वेने दिल्लीकडे रवाना करण्यात येतील. त्यावेळीही मोठा सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. २८ ते ३० ऑक्टोबरपर्यंत देशाच्या राजधानीत विशेष रेल्वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठविण्यात येतील. पुढे १ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या “अमृत वाटिके”त या कलशांमधील माती विसर्जित करण्यात येणार आहे.