‘…म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही’, रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला ‘तुम्ही तयार राहिलं पाहिजे’

India World Cup 2023 Squad: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून, या स्पर्धेसाठी नेमक्या कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. दरम्यान संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध शर्मा यांना संधी देण्यात आलेली नाही. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.
 
यावर्षी पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकप  होणार असून त्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला तेव्हाही तो मायदेशात खेळवण्यात आला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. दरम्यान, भारतीय संघ सध्या आशिया कप खेळत असून रोहित शर्माने वर्ल्डकप संघ निवडताना त्याचा विचार करण्यात आला नाही असं सांगितलं आहे. 

ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळालेलं नाही, त्यांचं दु:ख मी समजू शकतो. मीदेखील अनेकदा अशा स्थितीला सामोरा गेलो आहे. पण त्यांनी तयार राहिलं पाहिजे. संधी कधीही येऊ शकते. पण 15 जणांचा संघ निवडताना काहींना बाहेर ठेवावं लागतं आणि काहींना संधी मिळते असं रोहित शर्माने सांगितलं. वर्ल्डकपमधून बाहेर होणं कसं आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे जे या संघाचा भाग होऊ शकले नाहीत, त्यांना कसं वाटत आहे हे मी समजू शकतो असं त्याने सांगितलं. 

दरम्यान यावेळी त्याने मला वर्ल्डकपमध्ये पत्रकार परिषद घेताना मला अशी स्थिती आहे वैगेरे प्रश्न विचारु नका असं म्हटलं. कारण वर्ल्डपमध्ये माझं संपूर्ण लक्ष्य स्पर्धेवर असणार आहे, अशा प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही असं स्पष्ट म्हटलं. 

Related News

आयसीसीच्या नियमानुसार कोणताही देश 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या संघात बदल करु शकतो. 5 सप्टेंबपर्यंत प्रत्येक देशाला आपला संघ जाहीर करत आयसीसीकडे यादी सोपवायची आहेत. पण बदल 28 सप्टेंबरपर्यंत केला जाऊ शकतो. अजित आगरकरने जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर संघात बदल केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे. 

“आशिया कपमधूनच काही हाती लागणार नव्हतं”

“जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला माहित होते की आमचा वर्ल्डकपचा संघ कसा असेल. आशिया कपमधून आम्हाला योग्य चित्र पाहण्यास मिळणार नाही याची कल्पना होती. कारण येथे फक्त दोनच सामने खेळण्यास मिळणार होते. पण सुदैवाने आम्हाला पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करायला मिळाली. त्यामुळे आम्हाला सर्व बाजूंनी पाहता आलं,” असं रोहितने नेपाळविरोधातील सामन्यानंतर बोलताना सांगितलं. 

“अजून खूप काम करायचं आहे. बरेच लोक दुखापतीतून परत येत असून त्यांना पुन्हा खेळात येण्यास थोडा वेळ लागेल. हार्दिक आणि ईशानने पाकिस्तानविरोधातील सामन्यात चांगली खेळी केली आणि त्यामुळे आम्ही मोठी धावसंख्या उभी करु शकलो. नेपाळविरोधात गोलंदाजी ठीक होती पण क्षेत्ररक्षण वाईट होतं. आम्हाला त्यात सुधारणा करण्याची गरज आहे,” असं रोहित शर्माने म्हटलं आहे. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *