नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : मी सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. तुम्हीच ती विझविली पाहिजे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे खोट्या आश्वासनामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं आमचा सरकारवर विश्वास नाही. राज्यात सरकारने विश्वास गमावला. आता सरकारने पायउतार झालं पाहिजे, हे सरकार असंवैधानिक आहे असा घणाघात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात समाजसमाजात तेढ निर्माण होत असताना तिन्ही नेते एकमेकावर प्रश्न ढकलत आहेत. ही सामूहिक जबाबदारी असताना तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे हे सरकार आहे.खरेतर सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडवल्या पाहिजे. राज्यात उग्रपणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेच नुकसान करून,जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा तुमच्या मागणीला यश मिळवण्याचे काम सरकार करेल असा विश्वास आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा हा विषय संपवावा यावर विजय वडेट्टीवार यांनी भर दिला. मुळात राज्य सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज सरकार मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजासाठी बैठकीत काय निर्णय होतो याकडे आमचे लक्ष आहे.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असून आंदोलन संपवित मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना भेटून आम्ही केली आहे असे सांगितले.