मुंबई : सध्या महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे गुजरातला (Gujarat) हलवले जातायत. यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारला चांगलंच धारेवर धरलं जातय. आता महाराष्ट्रातील (Maharashtra) हिरे व्यापार देखील गुजरातला स्थलांतरित करण्यात येणार आहे. यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला. तर या सरकारला मुंबई आणि महाराष्ट्रपेक्षा गुजरातची जास्त काळजी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
याआधी वेंदात वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, विश्वचषकाचा अंतिम सामना यांसारखे अनेक मोठे प्रकल्प आणि कार्यक्रम गुजरातला स्थलांतरित करण्यात आले. त्यावरुन राज्याचं राजकारण देखील चांगलंच तापलं.
Related News
आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?
‘वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, बल्क ड्रग्स पार्क, 40 गद्दार, क्रिकेट वर्ल्ड कप फायनल… आणि आता डायमंड बोर्स… विचार करा !महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला! आणि हे सगळं बुलेट ट्रेन सुरु होण्याआधी. ह्या मिंधे-भाजपा चं ध्येय आहे की महाराष्ट्र सरकार पण गुजरात मधूनच चालवायचं आणि मुंबई पण!’ ‘ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे-भाजपाला आपण साथ देणार का?’ असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, बल्क ड्रग्स पार्क, ४० गद्दार, क्रिकेट वर्ल्ड कप फायनल… आणि आता डायमंड बोर्स… विचार करा!
महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला!आणि हे सगळं बुलेट ट्रेन सुरु होण्याआधी. ह्या मिंधे-भाजपा चं ध्येय आहे की महाराष्ट्र सरकार पण…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2023
या सरकारला गुजरातची जास्त काळजी – आदित्य ठाकरे
या सरकारला मुंबई आणि महाराष्ट्रपेक्षा गुजरात दिल्लीची जास्त काळजी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘तोडून मोडून हे सरकार बनलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रसाठी हे सरकार काही करेल असं आम्हाला वाटत नाही. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरुन केलं जातय हे आम्हाला माहित आहे. बुलेट ट्रेन काम पूर्ण झाल्यानंतर या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल.’
डायमंड बोर्स व्यापार केंद्राची निर्मिती
सुरतमध्ये मागील अनेक वर्षांपासून हिऱ्यांची निर्मिती केली जाते. पण सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे हा व्यापार मुंबईतून केला जात होता. हिऱ्यांची निर्मिती जरी सुरतमध्ये होत असली तरी त्याचा मुख्य व्यापार हा मुंबईतून होत होता. पण आता सुरतमध्ये डायमंड बोर्स नावाचं मोठं व्यापाराचं केंद्र सुरु करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचा कल आता सुरतकडे चाललाय.